
लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : शिवणे गावातील मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिक व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने नागरिकांना रस्त्यावर कचरा टाकल्यास दंड लावण्याचा निर्णय घेतला असला तरी अनेक जण अजूनही बेशिस्तपणे कचरा टाकत आहेत. स्थानिक प्रशासनाने स्वच्छता राखण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली होती. कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाड्या सुरू करण्यात आल्या, तसेच ज्या नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र, यानंतरही परिस्थितीत काहीच फरक पडलेला नाही.

मुख्य रस्त्यावर साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. पुणे महानगरपालिकेने स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. “नागरिकांनी सहकार्य केल्याशिवाय गाव स्वच्छ राहू शकत नाही. दंडात्मक कारवाई हा अंतिम उपाय आहे, पण जनजागृती हीच खरी गरज आहे,” असे मत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
स्थानिक रहिवासी विशाल देशमुख म्हणाले, आम्ही कचरा घंटागाडीला देतो, पण काही नागरिक अजूनही रात्रीच्या वेळी रस्त्यावर कचरा टाकतात. प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलली पाहिजेत. तर दुसरीकडे, काही नागरिकांनी कचरा उचलण्याच्या व्यवस्थेतील त्रुटींकडे लक्ष वेधले.