
लोकनीती न्युज नेटवर्क
मावळ : रविवारची सुट्टी आनंदात साजरी करण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी आजचा दिवस अत्यंत घातक ठरला आहे. मावळ तालुक्यातील कुंडमळा, इंद्रायणी नदीवरील साकव पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली असून, २० ते २५ पर्यटक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सध्या घटनास्थळी शोध आणि बचाव मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीएचे अग्निशामक पथक, तसेच लष्कराच्या एनडीआरएफ टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहे. एक महिलेचा मृतदेह आढळून आला असून तिची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. इतर पर्यटकांचा शोध घेण्यासाठी बोटी आणि गोताखोरांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

कुंडमळा हा परिसर तळेगाव दाभाडे आणि देहू गावाच्या दरम्यान असून, वर्षाविधी व निसर्गदर्शनासाठी येथे सप्ताहांत गर्दी वाढत असते. मात्र, इंद्रायणी नदीवरील साकव पूल जुना, अरुंद आणि कमकुवत झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पूल कोसळण्याच्या वेळी अनेक पर्यटक पुलावर उभे होते, आणि ते पाण्याचा प्रवाह पाहत होते. अचानक पुलाच्या लोखंडी आणि काँक्रीट रचनेत बिघाड होऊन तो पूर्णतः कोसळला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. काही तरुणांनी धाडस दाखवत पाण्यात पडलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी झाली होती, मात्र प्रशासनाने घटनास्थळी तातडीने नियंत्रण मिळवले. ही दुर्घटना प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे उदाहरण ठरली असून, स्थानिक नागरिकांकडून जुने पूल आणि अपायकारक ठिकाणांबाबत तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे.